मानसोपचारांची गरज काय?

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ

सगळ्यांच्या आयुष्यात ताणतणाव वाढलाय. वाढलेल्या ताणाला दोन हात करण्यासाठी उपचारांची गरजही भासतेच. अशावेळी थेरपी दिली जाते. पण या थेरपीबदद्ल आजही अनेक गैरसमज प्रचलित आहेत. ते गैरसमज नेमके काय आहेत आणि तथ्य काय आहे हे आजच्या लेखाद्वारे जाणून घेऊयात.

१. समस्यांबद्दल फक्त बोलून काही होणार नाही.

– फक्त बोलण्यानं समस्या सुटत नाहीत, हे शंभर टक्के खरं आहे. तुमच्याशी संवाद साधून तुमच्या रुग्णाच्या मनाचा ठाव घेण्याचं प्रशिक्षण थेरपी देणाऱ्या व्यक्तीला दिलेलं असतं. ते चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय सांगत असतात. थेरपी देणारी व्यक्ती फक्त माझ्याशी गप्पा मारतेय, मग उपचार कधी करणार? असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण त्याच चर्चेच्या माध्यमातून ते तुमची नेमकी समस्या काय आहे हे जाणून घेत असतात. नंतर त्या चर्चेच्या आधारावर तुमच्यावर कसे उपचार करायचे यावर ते विचार करतात. थेरपी देणाऱ्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधल्यानं तुम्हाला भेडसावणारे अनेक प्रश्न सुटू शकतात.

२. मला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या मदतीला अनेकजण आहेत. त्यामुळे थेरपीनं काही फरक पडणार नाही.

– तुमच्या कठीण काळात अनेकांचा खंबीर आधार असणं, ही बाब चांगलीच आहे. पण तुमच्या हितचिंतकांना प्रशिक्षण दिलेलं नसतं. तेच प्रशिक्षण थेरपी देणाऱ्या व्यक्तीला दिलेलं असतं. ही थेरपी देणारी व्यक्ती तुमचं म्हणणं किंवा तुमच्या समस्या व्यवस्थित ऐकून त्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. असे उपचार करताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा बाह्य प्रभाव नसतो. हेच जर तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला थेरपी देत असेल तर त्यांच्या निर्णयावर तुमच्याशी असलेलं भावनिक नातं आणि इतर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव असू शकतो.

३. मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळलेल्या व्यक्तीला थेरपी दिली जाते.

– कौन्सलिंग किंवा थेरपी ही फक्त मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्तीलाच दिली जाते, हा समज अत्यंत चुकीचा आहे. वेड्यांनाच मानसोपचारांची गरज असते हा आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेला मोठा गैरसमज आहे. याबाबत अधिकाधिक जागरुकता समाजमनामध्ये झाली पाहिजे. एखादी व्यक्ती इतर सामान्य माणसासारखी नोकरी करत आहे किंवा वागत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या भेडसावत नाही, असं म्हणणं चुकीचं ठरतं. अगदी सामान्य आयुष्य जगणाऱ्या, चारचौघांत वावरणाऱ्या व्यक्तीलाही मानसोपचारांची गरज भासू शकते.

४. तुम्ही काय करायचं याचेच सल्ले थेरपी देणारी व्यक्ती देते.

– प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती सल्ले देणं टाळते. ते त्यांच्यापरीनं तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच थेरपी देण्याची पद्धत प्रत्येक थेरपी देणाऱ्या व्यक्तीनुसार बदलते. थेरपीचं उत्तम प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा हे शिकवते. जेणेकरुन निर्णय घेण्यासाठी तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही. तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला योग्य दिशेनं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *