व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५  वाक्ये

मित्रांनो, माझ्या लेखन क्षेत्रातील गुरुंपैकी एक म्हणजे व. पु. काळेसर. आयुष्याला कंटाळलेल्या माणसाने त्यांचं लिखाण वाचावं, त्याला नक्कीच नव्याने जगण्याची खुमारी येईल. त्यांच्या विविध पुस्तकांमधून वेचून काढलेले हे २५ विचार. नक्की वाचा. आयुष्य आणखी रुचकर वाटेल.

 

१. गगनभरारीचं वेड:

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

 

२. झुंज:

वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

 

३. कॅलेंडर:

भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.

 

४. संघर्ष कुठपर्यंत?

आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे…समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

 

५. पडावं तर असं!

आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.

 

६. परिपूर्णता?

जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..

 

७. नको असलेला भाग:

दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.

 

८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ:

पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात…बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?

 

९. समस्या:

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.

 

१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?

प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.

 

११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान:

समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं  असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो.  तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.

 

१२. आयुष्याचे ‘सुयोग्य व्यवस्थापन’:

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे ‘सुयोग्य व्यवस्थापन’ असे म्हणतात.

 

१३. पळू नका:

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.

 

१४. पाठीची खाज:

पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..

 

१५. माफी:

माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.

 

१५. खर्च-हिशोब:

खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.

 

१६. गैरसमज:

गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.

 

१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान:

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

 

१८. अपेक्षा-ऐपत:

घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.

 

१९. अपयशाची भीती:

माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.

 

२०. खरी शोकांकिका:

बोलायला कोणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.

 

२१. कौतुकाची खुमारी:

कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.

 

२२. झरा आणि डबकं:

वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

 

२२. कागद-सर्टिफिकेट:

सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.

 

२३. रातकिड्याचा आवाज:

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.

 

२४. फुगा किती फुगवायचा?

एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.

 

२५. हरवण्यासारखं घडवा:

आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ‘माणूस’ राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!

 

संकलन : सरिता विनोद मेस्त्री – व्यवस्थापक  (VIBRANT SALONS PVT LTD)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *