‘रास्ते कहा खत्म होते है जिंदगी के सफर मे’
एकदा गवतावर अनवाणी चालत होतो. रस्त्याने महागडे बूट घालून चालणारा माणूस बघितला. विचार आला, ‘पायात चप्पल असती तर किती मस्त झालं असतं!’
पुढे चप्पल मिळाली. रस्त्याने चालताना एक सायकल चालवणारा माणूस दिसला. विचार आला,
‘एक सायकल असती तर किती मस्त झालं असतं!’
एखाद वर्षात सायकल मिळाली. सायकल चालवताना एक मोटरर्बाईक बाजूने गेली. विचार आला,
‘एक मोटर बाईक असती तर किती मस्त झालं असतं!’
पुढे मोटार बाईक घेतली. ती रस्त्याने चालवत असताना बाजूने एक कार गेली. विचार आला,
‘एखादी छोटी कार असती तर किती मस्त झालं असतं!’
काही वर्षांनी कार घेतली. कार चालवताना बाजूने एक महागडी आरामदाई कार गेली. विचार आला,
‘वा! हि माझी ड्रीम कार आहे. हि कार असती तर काय मस्त झालं असतं!’
काही वर्षांत त्या महागड्या कार मधून जाताना वर एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं,
‘वा! या हेलिकॉप्टर मधून जाण्याची मजाच काही और आहे. असं एक हेलिकॉप्टर घेऊ शकलो असतो तर किती मस्त झालं असतं!’
आता खूप काळ लोटलाय. आयुष्याची कित्येक वर्षे जे हवं ते कमवण्यात निघून गेली. आज हेलिकॉप्टरमधून उंचावर उडत असताना, जमिनीवर गवतात चालणारा एक माणूस पाहिला. विचार आला, ‘असं गवतात अनवाणी चालायला मिळालं असतं तर किती मस्त झालं असतं!’
मित्रांनो, आपल्या इच्छा-आकांक्षांना अंत नाही. एक मिळवली कि दुसरी उत्पन्न होणार आणि ती मिळवली कि तिसरी.
“माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी खंत ही आहे की स्वतःजवळ पैसे नसताना, त्याला आवडत नसलेल्या लोकांवर छाप पाडण्यासाठी त्याला नको असलेल्या वस्तू तो विकत घेत असतो.”
गरजा जेवढ्या वाढवणार तेवढ्या वाढतच जाणार. कुठे थांबायचं हे आपल्याला ठरवता यायला हवं.
मिर्झा गालिबची एक शायरी या निमित्ताने आठवते-
‘रस्ते कहा खत्म होते है जिंदगी कि सफर में
मंजिल तो वही है जहा ख्वाईशे थम जाये’
विनोद अनंत मेस्त्री – लेखक, प्रशिक्षक, वक्ता
९८१९४५३५३३/ www.vinodmestry.com
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!