कोण्या एका अनोळखी बेटावर जेव्हा फसलो मी
आपल्या जीवनात एक वेळ येते जेव्हा आपण परमोच्च सुख उपभोगत असतो, ‘जे चाललंय ते असंच चालू दे. हे बदलायला नको.’ असं आपल्याला वाटायला लागतं आणि अचानक काहीतरी घडतं आणि क्षणार्धात सगळं बदलून जातं. अत्यंत प्रयासाने घडवलेलं स्वप्नांचं जग आपल्या नजरेसमोर कोलमडून जातं. अशा परिस्थितीत काही लोक उध्वस्त होतात, तर काही लोक आपलं नवं जग घडवतात.
कोलमडलेल्या स्वप्नांना उभारी देणारी ही प्रेरणादाई कविता.
कोण्या एका अनोळखी, बेटावर जेव्हा फसलो मी
सुटल्या किनाऱ्याचा विचार येता, मनोमन हसलो मी
आठवणीही तयार नव्हत्या, जुन्या ठिकाणी परत फिरण्या
इतके विटले होते मन, स्थिरतेच्या रटाळ जिण्या
सगळं मिळाले याचं समाधान, भयंकर असतं कळलं मला
आभार मानले देवाचे, त्याने नवा किनारा दिला
“पुन्हा नव्याने सुरुवात, वा!” रोम रोम थरारले
नवनिर्मितीच्या विचारापुढे, स्थिरतेचे विचार हरले
कमावलेले सगळे सुटले, जरी जुन्या किनाऱ्यावर
एकच गोष्ट सोबत होती, हिम्मत मोठी आभाळभर
त्याच हिमतीच्या बळावर पुन्हा, नवं जग थाटायचं
जितक्या वेळा पाडेल नियती, दुप्पट आवेशाने उठायचं
लढण्याचा इतिहास माझा, हरणे माझ्या रक्तात नाही
जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही
तयार आहे नवी स्वप्ने, नव्या उमेदीने पूर्ण कराया
संकटांनो असेल हिंमत, तर या! तुमचे स्वागत तुम्ही या!!
आपला,
विनोद अनंत मेस्त्री (लेखक, प्रशिक्षक, वक्ता)
www.vinodmestry.com
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!