मला कळू दे
नात्यामध्ये गैरसमज हा फार भयंकर असतो. नात्यामध्ये बऱ्याचदा आपण जे पाहतो किंवा ऐकतो ते संपूर्ण सत्य नसते. समोर जे घडेल त्याला आपण आपले अर्थ जोडतो आणि आपलं एक सत्य बनवतो. आपण बनवलेल्या या सत्यामधूनच आपण ते नातं पाहायला लागतो. चुकीच्या अर्थातून बनलेलं हे सत्य आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं पाहूच देत नाही. आपण फक्त चुका शोधात राहतो आणि त्या व्यक्ती हळूहळू आपल्या जीवनातून कायमच्या निघून जातात.
यावर आधारलेली माझी हि कविता, ‘मला कळू दे’
तुझ्या शब्दांनी मी दुखावलो गेलो
मला तुझ्यापासून तुटल्यासारखं वाटलं
त्यावेळी मी निघून जाण्याआधी, दुरावण्याआधी
मला कळू दे, तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होता का?
मी बचावात्मक पवित्रा घेण्याआधी
दुखावून, चिडून किंवा घाबरून काही बोलण्याआधी
अर्थाच्या भिंती निर्माण करण्याआधी
मला कळू दे, मी खरोखरच ऐकलं आहे का?
मला बरंच काही बोलायचं आहे
जे आपल्या नात्यासाठी फार महत्त्वाचे आहे
जर माझ्या शब्दांमधून त्या भावना व्यक्त होत नसतील
तर प्लिज, मला मोकळं व्हायला मदत करशील का?
जर मी तुला कमी लेखतोय असं वाटलं
मला तुझी काळजी नाही असं वाटलं
मी तुला महत्व देत नाही असं वाटलं
तर मला व्यक्त करायच्या असलेल्या भावना
तुझ्या अर्थापालिकडे जाऊन, त्या ऐकण्याचा प्रयत्न करशील का?
विनोद अनंत मेस्त्री
लेखक, प्रशिक्षक, वक्ता
(आयलीड ट्रेनिंग्स, श्री कॉमर्स अकॅडमी, लाईफ रिचार्ज)
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!